आरोग्यमंत्र्यांनी दिले राज्यातील लॉकडाउन काही आठवड्यांनी वाढवण्याचे संकेत


मुंबई – राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, असे स्पष्ट केलं आहे. खास करुन लॉकडाउनचा मुंबई आणि शहरी भागांमधील कालावधी वाढवण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी संपत आहे. पण महाराष्ट्रामधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ एप्रिलपर्यंत कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. पण हा आकडा सध्या वाढत आहे. काही आठवड्यांसाठी आपल्याला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी असल्याचे मत टोपे यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठवाजेपर्यंत देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही या आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स डॉट कॉम’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आम्ही राज्यामध्ये देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच लॉकडाउनची घोषणा केली होती. आम्ही त्याआधीही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठीण काम असल्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. हा कालावधी मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढवावा लागणार असल्याचे माझे वैयक्तीक मत असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करताना लॉकडाउनचे निर्बंध टप्पाटप्प्यामध्ये काढण्यासंदर्भातील संकेत दिले. राज्य सरकारने लॉकडाउन काढून घेण्यासंदर्भातील नियोजन करावे आणि त्यासंदर्भात काही सल्ले अथवा सूचना असल्यास त्या केंद्र सरकारला कळवाव्यात असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. पण एकदम लॉकडाउनचे सर्व निर्बंध उठवल्यास मागील अनेक आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांचा आणि आतापर्यंत केलेल्या कामाला फारसा अर्थ उरणार नाही असे राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्याचे मत आहे.

कोरोनाचा मुंबईमध्ये फैलाव होण्याचा धोका असला तरी उपाययोजनांच्या बाबतीत राज्य सरकारने कोणतीही कसर सोडली नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. जागोजागी आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. सध्या मुंबईमध्ये २९२ टीम काम करत आहेत. कोरोनाचे संशयित रुग्ण ओळखण्यासाठी मुंबईमध्ये ८०० जण काम करत आहेत. दिल्लीमध्ये मागील महिन्यात निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमातील व्यक्तींना संसर्ग झाल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. पण यावर आम्ही नक्कीच नियंत्रण मिळवू, अशा शब्दांमध्ये टोपे यांनी मुंबईतील परिस्थितीचे वर्णन केले आहे.

Leave a Comment