आपले सण, उत्सव घरातच साजरे करा, बाहेर पडल्यास कठोर कारवाई


मुंबई : दररोज ‘कोरोना’ग्रस्तांच्या आकड्यात होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून योगदान द्यावे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजा-अर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असे सर्वधर्मीय नागरिकांना आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ती आज साडेपाचशेच्या जवळपास आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या भागात आढळत आहेत, ते भाग सील केले जात आहेत. डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशन दुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत.

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे या संपूर्ण लढ्याला धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच कोरोनाविरुद्धचा लढा हा जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राने यापूर्वीही अनेक संकटे परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचे गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीने, शहाणपणाने, घरातच थांबून, कोरोनाचे संकट परतवून लावूया, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment