नवी दिल्ली : 30 एप्रिलपर्यंत सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने तिकिट बुकिंग बंद केल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे काय निर्णय घेण्यात येईल याकडे आमचे लक्ष आहे.
सिव्हिल एव्हिएशनकडून काही दिवसांपूर्वी यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी त्यावेळी सांगितले होते की, 14 एप्रिलनंतर विमान कंपन्या कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. देशभरात 25 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो 14 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा वाढती प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे.