नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट अधिकच तीव्र होत असून देशात सध्या 1613 कोरोनाग्रस्त आहेत. तर यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला असून 148 लोकांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 72 नवे रूग्ण आढळून आल्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 300 पार गेला आहे.
कोरोना व्हायरसचे केरळमध्ये सात नवे रूग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 241वर पोहोचली आहे. तमिळनाडूमध्ये 55 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 50 रूग्ण दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 124 वर पोहोचला आहे.
23 नवे रूग्ण देशाची राजधानी दिल्लीमध्येही आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 23 नवे रूग्ण आढळल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 120 झाली आहे. देशातील इतर राज्यांबाबत बोलायचे झाले तर कर्नाटकात 101, उत्तर प्रदेशमध्ये 101, राजस्थानमध्ये 93, गुजरातमध्ये 74, मध्य प्रदेशमध्ये 66, जम्मू-काश्मीरमध्ये 55, हरियाणामध्ये 43, पंजाबमध्ये 41, आंध्रप्रदेशमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 27, बिहारमध्ये 21, चंदिगढमध्ये 13, लढाखमध्ये 13, अंदमान निकोबारमध्ये 10, छत्तीसगढमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 7, गोव्यामध्ये 5, हिमाचलप्रदेशमध्ये 3, ओदिशामध्ये 3, आसाम, झारखंड, मणिपूर, मिझोरम आणि पद्दुचेरी येथे प्रत्येकी एक एक कोरोना बाधितव आढळून आले आहेत.