विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर सांगली पोलिसांची कारवाई, जप्त केल्या 300 गाड्या


सांगली : सांगली पोलिसांनी शहरातील रस्त्यांवर विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून पोलिसांनी विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या आहे. पोलिसांनी अवघ्या चार तासात तब्बल 300 गाड्या ताब्यात घेतल्या आहे.

सांगलीकरांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घरपोच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या जातील असा इशारा सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी दिला होता. तरी देखील दुचाकी घेऊन भाजीपाला, किराणा, औषध अशी कारणे सांगून बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

काही महाभाग या इशाऱ्यानंतरही विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने पोलिसांनी आज (31 मार्च) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदी असूनही काही जण शहरात फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चार तासात तब्बल 300 गाड्या जप्त केल्या आहेत.

मुंबई-पुण्यानंतर सांगलीत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. सांगलीतील 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इस्लामपूरमधील कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इस्लामपूरमध्ये 29 मार्च ते 31 मार्चपर्यंत पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. या कालावधीत मेडिकल दुकाने दिवसाआड सुरु आहे. तर दूध, भाजीपाला, किराणा दुकानही बंद आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिले जातील, असे सांगून लोक घराबाहेर पडत आहेत.

Leave a Comment