तज्ज्ञांचा इशारा; 21 दिवसांचा नव्हेतर भारताला 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो


नवी दिल्ली : भारतातील परिस्थिती कोरोनामुळे दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सेवा 14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पण असे असले तरी, केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनात भारतील परिस्थिती सुधारण्यासाठी 21 दिवसांचा नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन असावा असे म्हटले आहे.

49 दिवस संपूर्ण राष्ट्रव्यापी लॉकडाऊन किंवा नियमितपणे दोन महिन्यांत काही दिवसांची विश्रांती त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन आवश्यक असून कोरोनाला भारतात पुन्हा उठण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे या संशोधनात सांगितले जात आहे. पण लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात ‘इज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टॅन्सिंग ऑन कोविड-19 एपिडिमिक इन इंडिया’ या शीर्षकाने एक अहवाल जारी करण्यात आला. याच गणिताचे एक मॉडेल देण्यात आले आहे. भारतातील लोकसंख्येचे वय आणि सामाजिक संपर्क रचना यांचा समावेश यामध्ये आहे. कोरोना रोखण्यासाठी सामाजिक अंतर सर्वात महत्वाचे आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे.

Leave a Comment