लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांबद्दल मी संपूर्ण देशाची माफी मागतो


नवी दिल्ली – संपूर्ण देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाउन सारखा निर्णय घ्यावा लागला. त्यासाठी संपूर्ण देशवासीयांची मी माफी मागतो. लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यातच हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. मी त्यासाठी देशातील नागरिकांची माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना म्हटले आहे. हे कठोर निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घ्यावे लागले आहेत. व्हायरसविरोधातील ही लढाई असल्यामुळे लॉकडाउन पुकारावा लागल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात द्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाची माफी मागितली.

तुम्ही लॉकडाउनचे नियम पाळून इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

कोरोना विरोधातील लढाई जिंकायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोना व्हायरससोबतची लढाई जिंकायची आहे. जगभरात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. अशी परिस्थिती भारतात उद्भवू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितले. माझ्यावर अनेक लोक नाराज असतील, मी असा कसा निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असेही अनेकांना वाटले असेल. पण कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. तसेच कोरोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment