दारुची दुकाने बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांची आत्महत्या


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व वस्तूंची दुकाने ही बंद राहणार आहेत. केरळमधील तळीरामांची केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चांगलीच गोची झाली आहे. केरळमध्ये दारुची दुकाने बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे केरळमध्ये आगामी काळात सरकारला, या समस्येलाही तोंड द्यावे लागणार आहे.

मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या संख्येत अधिक भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे वृत्त आहे. कोरोना बाधित रुग्णांवर सध्या सर्व महत्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्यामुळे दारुशी निगडीत असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मते घेत आहोत. या रुग्णांना गरजेनुसार तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयात आणता येईल, यासाठी प्रत्येक रुग्णालयात २० बेड स्वतंत्र ठेवण्यात आल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी दिली.

आम्ही दारु सोडवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये टेलि काऊन्सिलींगची सोय केली आहे. आमच्या केंद्रावर शनिवारी किमान १०० लोकं गंभीर अवस्थेत आली होती. या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज होती. गरज पडल्यास यासाठी आम्ही खासगी डॉक्टरांचीही मदत घेत आहोत. दररोज दारु पिण्याची काही जणांना सवय असते, ती दारु मिळाली नाही की त्यांच्यात नैराश्य यायला सुरुवात होते. यामधून मनात आत्महत्येचे विचार येतात. अंग थरथर कापणे, चक्कर येणे, घाम फुटणे अशी लक्षण सध्या केरळमधील व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळत असल्याचे, विशेष कार्यकारी अधिकारी. डी. राजीव यांनी सांगितले.

Leave a Comment