कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार केवळ पाच रुपयांत देणार शिवभोजन


मुंबई – राज्यात कोरोनाचा वढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी 10 रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी केवळ पाच रुपयांमध्ये नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर या योजनेचा विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या निर्णयामुळे सध्याच्या परिस्थितीत गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये राज्य सरकार देणार आहे. सरकारने यासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

ग्राहकांना हात धुण्यासाठी शिवभोजन चालकांनी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment