नितीन गडकरी यांची घोषणा, देशभरातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रसंगात काम करणे सोपे व्हावे यासाठी देशभरातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणे तात्पुरत्या स्वरुपात बंद केल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळे वाचू शकेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.


आपल्या ट्विटमध्ये गडकरी यांनी म्हटले आहे की, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. सध्या देशभरात कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हायवे तसेच राज्यांच्या सीमा या दरम्यान बंद करण्यात आल्या आहेत. या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहने, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहने आणि अॅम्ब्युलेंस आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत वाहनांना सेवा पुरवण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल.

Leave a Comment