राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 116 वर, मुंबईत चार तर सांगलीत पाच


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 116 झाली असून सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत असल्याचे आज आढळून आले आहेत. प्रवास इतिहास अथवा संसर्गातून मुंबईतील 4 नागरिक बाधीत झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश असल्यामुळे सांगलीतील आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

सांगलीमध्ये समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन केले आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जात असताना नागरिक मात्र पुरेशी खबरदारी घेतांना दिसत नाहीत. इस्लामपूर शहरातील काही ठिकाणी पोलिसांच्या पुढाकाराने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून नागरिक खरेदी करत आहेत.

सकाळी 7 ते 11 या वेळेत सांगली शहरात आजपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये भाजी खरेदीसाठी सांगलीकर नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले आहेत. तरीही शहरातील मंडईत नागरिकांची झुंबड उडाली आहे. प्रशासनाने कोणीही गर्दी न करता भाजीपाला न्यावा असे आवाहन केले आहे मात्र सकाळची गर्दी पाहिली तर सांगलीमध्ये कोरोनाचा संसर्ग व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे.

Leave a Comment