पुणे – कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्याकरिता पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कायमस्वरूपी भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाच्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
काही नागरिकांकडून राज्यात संचारबंदी लागू असतानाही बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. अकारण गाड्या घेऊन नागरिक रस्त्यावर उतरत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जे सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातील माणूस या संसर्गापासून मुक्त राहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.