मोदींच्या लॉकडाउनवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची टीका


मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पुढील 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदींच्या निर्णयावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली.

जयंत पाटील यांनी लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी जोरदार टीका केली. तर काल मध्यरात्रीपासून 21 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. पण जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. या गोष्टी सकाळी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, असे ट्विट करतच पाटील यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नसल्याचेही असेही स्पष्ट केले. महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.

Leave a Comment