कोरोनाविरुद्धच्या लढ्याला या उद्योगपतींचे आर्थिक बळ


नवी दिल्ली – देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 जवळ पोहचलेली असून देशातील सर्वच यंत्रणा अशा भयंकर आजाराला रोखण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत देशातील काही उद्योगपतींनीही आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. देशातील उद्योग क्षेत्रातील अनेक बड्या हस्तींनी पुढे येऊन कोट्यवधींच्या मदतीची सुरुवात केली आहे.


महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी या कार्याचा श्रीगणेशा केला. आपला संपूर्ण पगार कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील निधीला देण्याचे त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. तसेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही पगार देण्याचे आवाहन केले आहे. यापुढेही ते अजून काही घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


महिंद्रा यांच्या घोषणेनंतर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी देखील आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनिल अग्रवाल यांनी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत करणार असल्याची घोषणा अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरून केली. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मी 100 कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी जास्त चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment