कलम 144 ची पायमल्ली करणाऱ्या पुणेकरांना काठ्यांचा प्रसाद


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घराच्या बालकनीत किंवा खिडक्यांमध्ये येऊन टाळ्या वाजविण्याचे किंवा एखादे भांड वाजविण्याचे आवाहन केले होते. देशभरात उत्स्फुर्तपणे जनता कर्फ्यु पाळल्यानंतर मोठ्याप्रमाणावर नागरिक संध्याकाळी पाचनंतर बाहेर पडले. अनेकांनी एकत्र येत फटाके देखील उडवल्यामुळे अनेकांनी पंतप्रधानांच्या टाळ्या वाजविण्या मागील मुळ उद्देशाला हरताळ फासला. त्यामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असताना पुण्यात आज अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने पोलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक बंदीचा निर्णय घेतला.

कुठलेही वाहन घेऊन आज दुपारी 3 नंतर रस्त्यावर येता येणार नाही, असे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी दिल्यानंतर दुपारी 3 नंतर पोलिसांनी रस्त्यांवर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. विनाकारण रस्त्यावर जे नागरिक फिरताना आढळले त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यात तरुणांची संख्या अधिक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी नागरिकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. पुणेकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखेर आज पुणे पोलिसांनी कठोर पाऊले उचलली.

विविध ठिकाणी दुपारी तीननंतर नाकाबंदी करुन पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात सर्वच वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान 31 मार्चपर्यंत ही वाहतूक बंदी शहरात लागू करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment