राज्यातील नागरिकांना आरोग्यमंत्र्यांचे रक्तदान करण्याचे आवाहन


मुंबई : राज्यातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यातील नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करु नये, असे काहीही नसून रक्तदान केल्याने कुठलाही धोका नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे महाराष्ट्रात आणखी एकाचा बळी गेला आहे. या कोरोनाबाधिताचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत. आता त्यातच रक्ताची कमतरता भासू लागली आहे.

याबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, राज्यातील रक्तपेठ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आजपासून 10-15 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठी या पेढ्यांमध्ये शिल्लक आहे. सगळ्यांना आवाहन आहे आणि रक्त पेढ्यांनीही दखल घ्यावी की, मोठ्या संख्येने रक्त संकलनाचे काम करावे परंतु त्यामुळे संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना असताना रक्तदान करु नये असे काही नाही. याची संपूर्ण माहिती घेऊन सांगत आहोत. त्यामुळे रक्तदान केल्याने संसर्ग होणार नाही किंवा अशक्तपणा येणार नाही. रक्ताचा कमी झालेला साठा पुन्हा भरुन काढावा.

रक्तदान सुरु राहिले पाहिजे. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम शिथिल करता येणार नाही. फार गर्दी करु नये. परंतु रक्तदान हे सामाजिक भान असलेले कार्य आहे आणि गरजेची बाब आहे. सध्याची ही मागणी आहे. मोठे कॅम्प न घेता, जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दहा-दहाच्या ग्रुपमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरु ठेवावे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave a Comment