लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई ; 1000 रूपये दंड किंवा 6 महिन्याची जेल


नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या निर्देशात लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांना 1000 रुपये दंड आकारला जाईल किंवा 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे.

देशातील 23 राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत दिल्ली, उत्तराखंड, बिहार, महाराष्ट्र यासह अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये 25 मार्चपर्यंत 16 शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लोकांना गर्दीत जाण्यापासून रोखणे लॉकडाऊन हा एकमेव उद्देश आहे. जेणेकरुन देशात कोरोना स्टेज -3 मध्ये जाऊ नये.

पण या नियमांची पायमल्ली काही राज्यांमधून होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ज्यामध्ये लोक पूर्णपणे लॉकडाऊनचे पालन करताना दिसत नाहीत. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली बाहेर फिरताना दिसतात आणि आता ही परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने परिपत्रकात जाहीर केले आहे.

Leave a Comment