मुख्यमंत्री भावाचे राज ठाकरेंकडून कौतुक


मुंबई : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. आपल्या भावाच्या कामाचे कौतुक करत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी बोललो. ज्या प्रकारे ते काम करत आहेत. ते योग्य प्रकारे करत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री झाल्यानंतर राज यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. जे लोक डॉक्टरांवर हात उचलत होते, त्यांना आज जाणीव झाली असेल. आज लोकांना गांभीर्य समजत नाही. जनता कर्फ्यू टेस्ट केस होती, तरी लोकांनी ऐकले नाही तर कडक पावले उचलावी लागतील.

व्हायरस पसरला तर तो आवरण्यासाठी यंत्रणा आहेत का? जनता कर्फ्यूनंतर टाळ्या वाजवण्यासाठी लोके टोळक्याने बाहेर येत होते. जल्लोष करत होते. लोकांना काही गांभीर्य आहे की नाही? प्रत्येकाच्या घरावर टकटक झाली तरच आपण ऐकणार का?’ असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थितीत केला.

आपल्या मागे कोरोना हात धुऊन लागला आहे. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील जनतेला हात जोडून विनंती आहे. हे प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चची निर्बंधांची तारीख पुढे जाणार असेच चित्र आहे. टोलनाक्यावर आज जे गर्दी करत आहेत. त्यांना विनंती आहे की घरी बसा. जे काही चालू आहे ते आपल्या जगण्यासाठी चालू असल्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

डॉक्टरांना परिवार नाही का? जीव धोक्यात घालून ती लोकं आपल्यासाठी लढत आहेत. पण काही लोकं रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. त्यांना लाज वाटत नाही का? आपणहून ज्या गोष्टी पाळायला पाहिजे त्या पाळणे आवश्यक आहे. अनेकांच्या हातावर घरी राहण्यासाठी स्टँप मारले आहे आणि ती लोकं ते बिनधास्त बाहेर फिरत आहे. मूठभर लोकांना जर समज येत नसेल तर सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. या कठीण प्रसंगी जे मदतकार्य करत आहेत. त्या सर्व डॉक्टर पोलिसांना धन्यवाद देतो, अशा शब्दात राज यांनी आभार मानले.

Leave a Comment