मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही वाढला असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले असून नागपूर आणि अहमदनगरमधील रुग्णालयातून कोरोनाचे संशयित रुग्ण पळून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडल्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयातून पळून जात असल्याने आता गृहमंत्र्यांनी कठोर पाउल उचलत अशा रुग्णांवर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic diseases act) लागू करण्यात आला आहे.
वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला
'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे.#WarOnCorona— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2020
हा कायदा 123 वर्ष जुना असून एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार राज्यांना दिले जातात. हा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यात आल्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. अहमदनगर आणि इतर ठिकाणाहून काही रुग्ण पळून गेल्याच्या घटना समोर आल्याने आता पोलीस प्रशासनाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.