२६ मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज स्थगित


भोपाळ – आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार होती. पण विधानसभेत जोरदार गदारोळ झाल्याने विधानसभेचे कामकाज २६ मार्चनंतर स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना त्यामुळे तूर्तास दिलासा मिळाला आहे. सत्ता टिकवण्याचे कमलनाथ यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

विधानसभा सदस्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्या अभिभाषणानंतर सभागृहात जोरदार गदारोळ केल्यानंतर विधानसभा तहकूब करण्यात आली. राजीनामे ज्या विधानसभा सदस्यांनी दिले आहेत, त्यांचे राजीनामे स्विकारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणामध्ये वेगाने हालचाली घडत आहेत.

मध्य प्रदेशचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (१७ मार्च) सुरू होत आहे. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर लगेच कमलनाथ यांना त्यांचे बहुमत सिद्ध करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. पण, सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. भाजपमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे सरकार धोक्यात आले होते. कारण सिंधिया यांच्या प्रवेशाबरोबर २२ आमदारांनी राजीनामे दिले होते.

एकूण २३० जागा मध्य प्रदेशच्या विधानसभेत आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडे असलेल्या ११४ जागांपैकी २२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे आता ९२ आमदारांचे संख्याबळ आहे. तर भाजपकडे १०७ जागा आहेत. जर काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाले तर भाजपची सत्ता येणास कोणतीही अडचण येणार नाही. कारण २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने बहुमताचा आकडा १०४ वर येणार आहे.

Leave a Comment