छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाणार औरंगाबाद विमानतळ


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे औरंगाबाद विमानतळाचे नाव होणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून विमानतळाचे नामांतर करण्याची मागणी होत असून याबाबतचा ठराव औरंगाबाद महापालिकेनेही संमत केला आहे. हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आता याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मान्यता दिली जाईल. यानंतर केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल.

भाजपने विमानतळाच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. विमानतळ नामकरण झाले, तरी शहराचे नामकरण करण्यापासून पळ काढता येणार नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाव बदलले, तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष विरोध करु शकतात, म्हणून शहराचे नाव बदलण्याऐवजी विमानतळाचे नाव बदलले. ही पळवाट आहे. शहराचे नाव संभाजीनगर करण्याची आमची मागणी कायम असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

Leave a Comment