सब टिव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला असून याबद्दल सब टिव्ही तसेच मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 3, 2020
आपल्या ट्विटर अकाऊंटवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मनसेची भूमिका मांडत, हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचे म्हटले आहे. मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचे खोपकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईची भाषा हिंदी ?!?@MarathiRT @Mazi_Marathi @MarathiBrain @Marhathi @marathi_bola @South_Indians @AsitKumarrModi @TMKOC_NTF @sabtv #stophindiimposition #मराठीबोलाचळवळ #मराठी #म pic.twitter.com/54cKR8qmui
— Shubham Botre (@shubhammbtr) March 3, 2020
या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या एका भागात प्रत्येक समुदायातील व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा निश्चय करतो. बापुजी हे पात्र यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये मध्यस्थी करत आणि सर्वांचे मनोमिलन घडवून आणतात. यादरम्यान मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद बापुजींच्या तोंडी दाखवण्यात आल्यामुळे या प्रकरणी आता सब टिव्ही आणि मालिकेचे निर्माते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.