चिथावणीखोर भाषणांमुळे अभिनेत्री स्वरा भास्करच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल


कानपूर : गेल्या काही दिवसांपासून विविध व्यासपीठांवरुन बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनपीआर, एनआरसी विरोधात वक्तव्य करीत असून स्वराला काही दिवसांपूर्वी एनआरसीसंदर्भात पश्न विचारला होता, त्याला तिने दिलेले उत्तर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ झाली आहे. कानपूरमधील सीएमएम-७ कोर्टात स्वरा भास्कर हिच्या विरोधात कानपूरचे वरिष्ठ अधिवक्ता विजय बक्शी यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

युट्यूबवर विजय बक्शी यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अंतर्गत स्वरा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 20 मार्च ही तारीख दिल्याचे बक्शी यांनी सांगितले.

विजय बक्शी यांनी पुढे सांगितले, आपल्या चिथावणीखोर भाषणांमुळे स्वरा भास्कर भारत सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भडकावू भाषण करत आहे. या कारणांमुळे दोन समाजात वाद उद्भवत आहे. या संदर्भात मी देखील स्वरा भास्करचा एक व्हिडीओ पाहिला होता, ज्यामुळे दिल्लीत दंगलीची परिस्थिती उद्भवली. हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आईबीचे अंकित शर्मा यांची या दंगलीत हत्या करण्यात आली होती. या सर्व कारणांमुळे मी ही याचिका दाखल केल्याचे बक्शी यांनी सांगितले.

त्याचबरोबर विजय बक्शी यांनी सांगितले की, सीआरपीसी २०० अंतर्गत वादीचे म्हणणे मॅजिस्ट्रेटच्या समोर मांडले जाते. माझे म्हणणे मी मांडल्यानंतर साक्षीदारांचे म्हणणे ऐकले जाईल. यानंतर सरकारकडे मी देशद्रोहाचे प्रकरण पुढे चालविण्याची परवानगी घेईन. सध्या सुरू असलेल्या कन्हैया कुमार प्रकरणात केजरीवाल सरकारने मंजुरी दिली आहे. यानंतरच देशद्रोहचे प्रकरण चालते.

Leave a Comment