शिवभोजन थाळीचा 17 दिवसात दोन लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला आस्वाद


मुंबई : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. 17 दिवस 11 फेब्रुवारी 2020 रोजी योजनेच्या अंमलबजावणीला पुर्ण झाले. राज्यात या 17 दिवसांच्या काळात दोन लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याचे दिसून आले आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या प्रजासत्ताकदिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 पर्यंतच एक लाखांहून अधिक (1 लाख 5 हजार 887) झाली होती. आता 11 फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना शिवभोजन केंद्रातून चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. त्यांनी याच उद्देशाने काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता.

त्यांनी नागरिकांना जेवणाबाबत समाधानी आहात का, जेवणाची चव व्यवस्थित आहे का, काही सुचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहनही केले होते. त्यावर जेवण खुप छान आहे. गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया योजनेतील थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती.

शिवभोजन केंद्र जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये, इ. ठिकाणी सुरु करण्यात आली आहेत त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची 11300 थाळींची संख्या आता 14639 वर पोहोचली आहे.

Leave a Comment