बारामती : ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी क्रिकेट करंडकातील सामना रंगणार आहे. त्यांच्याच हस्ते या सामन्याचा प्रारंभ केला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांच्या हस्ते 12 फेब्रुवारीला या सामन्याचा प्रारंभ होईल.
बारामतीत रणजी सामान्यांचे आयोजन व्हावे या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआयनेही रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या स्टेडियममधील पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघात होणार आहे.
शुक्रवारी रणजी करंडकात 41 वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई संघाचा स्वप्नभंग झाला. सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात खेळलेला सामना चौथ्या आणि शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे सौराष्ट्रला तीन, तर मुंबईला एक गुण मिळाला. त्यामुळे मुंबई स्पर्धेतून बाहेर गेली आहे.