राज ठाकरेंच्या तलवारबाजीला नवाब मलिक यांचे प्रतिउत्तर


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चे काढणाऱ्यांना जास्त नाटक कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशारा दिल्यानंतर राज्याचे अल्पसख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हे कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे कोणीही हातात दगड, तलवार घेण्याची भाषा करू नये असे वक्तव्य केले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर दगडाला उत्तर दगडाने, तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरवरुन राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली. देशात कायद्याचे राज्य आहे. कोणी कायदा हातात घेतला तर कायदा कायद्याचे काम करील असे नवाब मलिक म्हणाले. हातात दगड तलवार घेण्याची भाषा कोणीही करू नये, हे कायद्याचे राज्य असल्याचे मलिक म्हणाले.

स्वतःची भूमिका स्विकारायचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार असतो. काही राजकीय पक्ष मोर्चे काढतात, पण त्यांच्या मागे कोणीतरी आहे, असा अप्रत्यक्ष टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला. सरकारला अशा मोर्चामुळे काही फरक पडत नाही. दगडाची आणि तलवारीची भाषा करून राज्यात अशांतता पसरवण्याचे कोणीही प्रयत्न करू नये. आम्ही गांधीवादी असताना हिंसा सहन करणार नसल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

Leave a Comment