गावातील ५ लोकांनाही मिळत नाही सरकारच्या कर्जमाफीचा फायदा


बुलडाणा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचे नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असे म्हटले आहे. रोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर प्रहार केला.

मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी शेतकऱ्यांना तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता गावातील ५ लोकांनाही जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्याचे शेट्टी म्हणाले. हे सरकार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणाऱ्या सरकारच्या विरोधात उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी करुण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पिकविमा 100 टक्के मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात यावा. तसेच सीएए, एनआरसी कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा. या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीपासून उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर आयोजित सभेत राजू शेट्टींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सरकारवर टीका केली.

Leave a Comment