सरकारच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंचे प्रश्नचिन्ह


पुणे – महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या कर्जमाफी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्हाला आत्तापर्यंत किती लुटले गेले याचा हिशोब सरकारने दिला तर शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्याकडेच निघतील, त्याचबरोबर दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे वक्तव्य केले.

तूर डाळीला हमीभाव देणे आणि तो जाहीर करणे, हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण, जबाबदारीने केंद्र सरकार त्यांचे काम करत नाही, अशी खंत बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केली. शेतकऱ्यांचे तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळे नुकसान झाले. हे नुकसान अगणित असून अंकातही त्याचा विचार करू शकत नाही. त्यांनी हे सांगतानाच शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे म्हटले.

कायद्यावर कायदे येत आहेत, पण केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा हे आणू शकत नाही, अशी शोकांतिका शेतकऱ्यांसाठी लढा देणारे राज्यमंत्री बच्चू कडूंनी व्यक्त केली. शिवसेनेला उद्देशून बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्व सोडले नसेल तर एनआरसीला ते समर्थन देतील, असे वक्तव्य केले होते. बच्चू कडूंनी त्याला उत्तर देताना राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा भाजपला सल्ला दिला.

दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहाच्या निकृष्ट अन्नाचा विषय निकाली काढून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने बच्चू कडूंनी ठेकेदारावर कारवाई करण्याचे ही आश्वासन दिले.

हिंदूंच्या कार्यक्रमाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आमंत्रण देऊ नये, असे पत्रक काढणाऱ्या संघटनेला गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनस्तापामुळे सुट्टीवर गेले, असे वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे हे विचार करण्याऐवढे मोठे नसल्यामुळे राणेंना काही अर्थ नाही, त्यांनी आत्तापर्यंत किती पक्ष बदलले. हे पाहता त्यांच्या शब्दांचा आपण किती विचार करावा, अशी राणेंची खिल्ली बच्चू कडूंनी उडवली.

Leave a Comment