केंद्राला नकोसा झालेला ‘चित्ररथ’ आता शिवाजीपार्क येथील संचलनात दिसणार!


मुंबई – केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथसंचलनात नाकालेला ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग – कान्होजी आंग्रे’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ आता राज्यातील ठाकरे सरकारने स्वीकारला आहे. मुंबईमधील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या पथसंचलनात या चित्ररथाची झलक दाखवण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी, अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र, हे लक्षात घेऊन स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. अनेक वीरांनी या आरमार उभारणीत मोठे योगदान दिले. त्यापैकी एक कान्होजी आंग्रे होते. स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली समुद्रामध्ये स्वराज्याचे तोरण कसे बांधले? तसेच शिवाजी महाराजांच्या आरमाराने इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा या चित्ररथातून उलगडून सांगितली जाणार आहे.

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कान्होजी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या चित्ररथाची बांधणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जहाजावर उभा करण्यात आला आहे. तसेच कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची माहिती देणारा जिवंत देखावाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणार आहे.

या चित्ररथाला यंदा केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या परवानगी नाकारल्यामुळे यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसला तरी तो शिवाजी पार्क येथील संचलनात दिसणार आहे. याबाबत ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत हा चित्ररथ स्वीकारला आहे.

Leave a Comment