भाजप नेत्याचा अजब दावा; पोहे खाण्याच्या सवयीवरुन ओळखले बांगलादेशी


नवी दिल्ली: भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात, असा अजब सिद्धांत मांडला आहे. शुक्रवारी इंदूर येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA)समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विजयवर्गीय बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले की, माझ्या घराचे काही दिवसांपूर्वी काम सुरु होते. हे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांपैकी काहीजण बांगलादेशी असल्याचा संशय मला होता. मी त्यांच्या खाण्याच्या सवयीवरून हा अंदाज लावला.

पोळी ते मजूर खात नव्हते, केवळ भरपूर पोहे खायचे. हिंदी ते बोलत नाही, पण त्यांना हिंदी समजत नाही. ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे सांगू शकत नाहीत, ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे त्यांनी सांगितले असते तर मी समजू शकलो असतो, कारण पश्चिम बंगालची मला बारीक माहिती आहे, पण अशी माहिती त्या कामगारांना नसल्यामुळे ते मजूर बांगलादेशी असावेत, असा निष्कर्ष मी काढला. विशेष म्हणजे ते दोन दिवसांनंतर पुन्हा माझ्या घरी आलेच नाहीत. याची मी पोलिसांत तक्रार केली नाही. पण लोकांनी सावध राहावे म्हणून ही गोष्ट मी सांगत असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले होते.

आता कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्यांना सोशल मीडियावरही अनेकांनी ट्रोल केले. विजयवर्गीय यांच्या वक्तव्यातून भाजपप्रणीत एनडीए सरकार एनपीआर म्हणजे लोकसंख्या नोंदणी कशा पद्धतीने राबवेल याची झलकच दिसून आली आहे. धर्म, भाषा, समुदाय व खाण्याच्या सवयी यावरून लोकांची ओळख पटवली जाईल असाच याचा अर्थ होतो, अशी टीका विरोधकांनी केली. दरम्यान, विरोधकांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे कैलास विजयवर्गीय सांगितले. ते उदाहरण शरणार्थी व घुसखोर यांच्यातील भेद दाखवण्यासाठी मी दिल्याचे त्यांनी स्पष्टीकरण विजयवर्गीय यांनी दिले.

Leave a Comment