ठाकरे सरकारने रद्द केल्या फडणवीस सरकारच्या ‘त्या’ नियुक्त्या


मुंबई – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तसेच ‘महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय काल (बुधवारी) घेण्यात आला.

उर्दू साहित्य अकादमीवर डॉ. मुशफ्फी अहमद सिद्दीक उर्फ डॉ. राणा कार्याध्यक्ष यांच्यासह 11 अशासकीय सदस्य होते. यांच्या नियुक्त्या कालपासून रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पंजाबी साहित्य अकादमीवर कार्याध्यक्ष राजन खन्ना यांच्यासह 11 अशासकीय सदस्य कार्यरत होते. या नियुक्त्याही बुधवारपासून (15 जानेवारी) रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले, की शासनामार्फत अल्पसंख्याक समुदायांच्या भाषांचा विकास करणे, या भाषांचे संवर्धन करणे तसेच या भाषेतील साहित्यिक आणि मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारीक आदान-प्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने उर्दू साहित्य अकादमी, पंजाबी साहित्य अकादमी आदींची स्थापन करण्यात आली आहे. त्या त्या भाषांमधील तज्ञ आणि या भाषांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या नवीन अशासकीय सदस्यांची दोन्ही समित्यांवर लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुरेसे मनुष्यबळ, भरिव निधी आणि संपूर्ण प्रोत्साहन उर्दू साहित्य अकादमी, पंजाबी साहित्य अकादमी यांसह विविध अल्पसंख्याक भाषांशी संबंधीत संस्थांना देऊन या अकादमींचे सक्षमीकरण करण्यात येईल. या भाषांचे संवर्धन, जतन आणि विकास करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री मलिक म्हणाले.

Leave a Comment