मग शरद पवारांचा जाणता राजा असा उल्लेख केलेला कसा चालतो ?


मुंबई – राजकीय पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने होणाऱ्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेले कसे चालते ? अशी विचारणा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी यावेळी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जाणता राजा ही वापरली जाणारी उपमा आहे. शरद पवार यांच्यासाठी ती उपमा सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. ‘इंदिरा इज इंडिया’ असे इंदिरा गांधी यांना म्हटले गेले आहे. तेही तुम्हाला मान्य असल्याची आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

विरोधक राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत नीच दर्जाचे राजकारण केले जात आहे. जेव्हा बांगलादेशविरोधातील युद्ध इंदिरा गांधींनी जिंकले, त्यांना तेव्हा दुर्गादेवीचा अवतार म्हणण्यात आले होते. इंदिरा गांधी कधीच दुर्गादेवीची बरोबरी करु शकत नाही हे माहिती होते. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना असे वक्तव्य अनेकदा केले जाते. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असेही म्हणण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजी ही शरद पवार यांना उपाधी देण्यात आली होती. शरद पवारांवर जाणता राजा नावाने पुस्तक निघाले. ३५ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्महत्या केली. मग शरद पवारांवरील पुस्तकाला जाणता राजा नाव का देण्यात आले ? ही उपाधी महाराजांशिवाय कोणालाही लागत नाही. जाणता राजा म्हणजे गावचा सरपंच नव्हे, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.

शिवाजी महाराज या देशात पुन्हा जन्माला येणे शक्यच नाही हे खरे आहे. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत कोणीही त्यांच्या तुलना करु शकत नाही. ते नरेंद्र मोदीदेखील करु शकत नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. पण ज्याप्रमाणे मोदी देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक जटील प्रश्न सोडवले त्यामुळेच त्यांच्याबद्दल घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुर्गादेवीची उपमा जेव्हा इंदिरा गांधींना दिली तेव्हा यांचे कंठ कुठे गेले होते ? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी जाणता राजा पवारसाहेब कधीच होऊ शकत नाही. सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. मग महाराजांचे वंशजही राजीनामा देतील असे प्रत्युत्तर दिले. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचे हे पुस्तक काम आहे. इंदिरा गांधींचे मंदीर तामिळनाडूत बांधण्यात आले होते. जेव्हा मोदींना आपले मंदीर बांधण्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी फटकारले होते. पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात पण यामुळे ही पक्षाची भूमिका असल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Comment