अशोक चव्हाण आणि अजित पवारांमध्ये खातेवाटपावरुन खडाजंगी ?


मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. काल मुंबईत हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यात या बैठकीत वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांनी उल्लेख केला. अशोक चव्हाण यावरुन संतापल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत, मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असल्यामुळे जे काही तुम्हाला बोलायचे आहे, ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असे अशोक चव्हाण अजित पवारांना म्हटले.

त्यानंतर परत पृथ्वीराज चव्हाणांचा विषय काढत अजित पवारांनी ते संयमी नेते असल्याचे म्हटले. त्यावरुन वाद उफाळला. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असेही अजित पवार म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या अशोक चव्हाणांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहिती आहे. यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिस्त आहे.

Leave a Comment