आमदार संग्राम थोपटेंनी कधीही भाजपमध्ये यावे


पुणे – मी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना ओळखतो. एखाद्या खात्याची जबाबदारी त्यांना मंत्रिमंडळात द्यायला हवी होती. पण, मंत्रीपदापासून त्यांना लांब ठेवण्यात आले. जर काँग्रेसचे विचार त्यांना पटत नसतील तर भाजपची दारे त्यांच्यासाठी कायम उघडी असल्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी नाराजी व्यक्त करत पुणे येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर खासदार बापट प्रतिक्रिया देत होते. ते पुढे म्हणाले, अनंतराव थोपटे हे त्यांच्या पक्षाशी अत्यंत एकनिष्ठ आहेत. त्यांच्याच पक्षातील काहींनी त्यांना पाडण्याचा प्रयोग केला होता. आता संग्राम थोपटे यांच्यासोबतही असेच होत आहे. काँग्रेसचे विचार जर थोपटेंना पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवावी त्यांना आम्ही निवडूण आणू, असेही खासदार गिरीश बापट म्हणाले.