मुख्यमंत्री ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना भाजपपासून सावध राहण्याच्या सूचना


मुंबई : दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवीन मंत्र्यांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवीन मंत्र्यांना या बैठकीत भाजपपासून सावध राहा अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

तुमची आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा भाजप प्रयत्न करेल. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. अत्यंत संघर्षानंतर हे सरकार बनले आहे याची जाणीव ठेवा. भाजपने त्यांचे प्रयत्न सुरू केले आहे. खूप काम करा आणि तुमचे लक्ष भाजपमुळे विचलित होऊ देऊ नका. तुम्हाला माहित आहे की हे सरकार अत्यंत सक्षम आहे. आपण संपूर्ण पाच वर्ष नक्की पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती एका मंत्र्यांच्या माध्यमातून समोर येत आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपले (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) विचार भिन्न असले तरी आपण एक आघाडी आहोत. आपल्याला लोकांनी निवडून दिले असल्यामुळे आपण एकत्रितरित्या लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत. आपल्यात मतभिन्नता असली तरी आपण एका परिवारासारखे काम करणार आहोत. राज्याचा विचार आपल्याला करायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे एका मंत्र्याने सांगितले.

दुसरीकडे अजित पवार मंत्र्यांना संबोधित करताना काय म्हणाले हेही या मंत्र्याने सांगितले. यापूर्वीच खूप अडचणी निर्माण करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. आपण भाजपशी निपटण्यासाठी सक्षम आहोत. काहीही काळजी करू नका. तुम्ही मंत्री आहात तर मंत्र्यांसारखे वागा. उगीच सरकारी गोष्टींवरुन आक्रमक होऊ नका, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या.

Leave a Comment