वाघासारखी डरकाळ्या फोडणारी शिवसेना आता बकरीसारखी झाली


सातारा – 2 लाखांहून अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकर्‍यांवर उद्धव ठाकरे सरकार अन्याय करत असून त्यांचादेखील सातबारा कोरा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा सातबारा सरकारने कोरा न केल्यास सरकारचा सातबारा आम्ही कोरा करू, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. तसेच विचार सोडून उद्धव ठाकरे वागणार असतील तर त्यांच्या महाविकास आघाडी सरकारची माती झाल्याशिवाय राहणार नसल्याची टीकाही त्यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने नागरिक सुधारणा विधेयक संमत केले आहे. पण, काँग्रेस या विधेयकाच्या निमित्ताने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आठवलेंनी केला. यावेळी ते पुढे म्हणाले, आतापर्यंत 2 लाखापर्यंत कर्ज घेणार्‍या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली आहे. पण, 2 लाखांहून अधिकचे कर्ज ज्या शेतकर्‍यांनी घेतले आहे. त्या शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. त्यांचाही सातबारा कोरा करण्याची गरज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर उद्धव ठाकरे यांनी आघाडी केली आहे. शिवसेना सत्तेसाठी त्यांची गुलामगिरी करत असल्याचेही ते म्हणाले. तसेच एकेकाळी वाघासारखी डरकाळ्या फोडणारी शिवसेना आता बकरीसारखी झाली आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्रात नागरिकत्व विधेयकाची आता महाराष्ट्रात अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे हे सरकार बांगलादेशी घुसखोर हाकलून देणार नाहीत. सध्या संसदेत नागरिकत्व कायदा पास केला आहे. पण, मुस्लिम समाजाची या कायद्याने दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. युवकांची माथी भडकवली जात असल्याचा आरोप आठवलेंनी केला.

आफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून 2014 नंतर या देशात अनेक मुस्लिम आले आहेत. हा कायदा त्या मुस्लिमाच्या संबंधित आहे. अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध, सिख, इसाई, पारसी आणि जैन त्यांना नागरिकत्व देण्याबाबतचा हा कायदा आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेस सरकारला तीव्र आंदोलन करण्याची संधीच मिळाली नाही. नागरिकत्व कायद्यामुळे ती मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम समाजाला पुढे करून आंदोलन करू पाहत आहे.

Leave a Comment