2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार ठाकरे सरकार ?


नागपूर : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी महाआघाडी सरकारने समिती स्थापन केली असून 2 टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी ठाकरे सरकार करणार आहे. आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच मार्च 2020 च्या आधी पहिला टप्पा होणार आहे. तर एप्रिल 2020 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी होणार आहे. ठाकरे सरकारने कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्ती केली आहे. नियमित आढावा ही टीम घेणार असून सरकारने बँकांकडून शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती मागवली आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृहात तसेच पायऱ्यांवर काल जोरदार गोंधळ घातला. शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून भाजपने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच हेक्टर २५ हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याचबरोबर दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार असल्याची ग्वाही दिली. शिमगा करायचा असेल तर केंद्रात भाजपचे सरकार आहे तिकडे जाऊन करा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

Leave a Comment