आयपीएस अधिकाऱ्याचा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात राजीनामा


मुंबई – आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती रहमान यांनी स्वत: टि्वट करत दिली. १९९७च्या बॅचचे अधिकारी असलेले रहमान सध्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. भारताच्या धार्मिक एकतेविरोधात हे विधेयक असल्याची टीका रहमान यांनी केली आहे.

भारताच्या धार्मिक एकतेच्या विरोधात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असून सर्व न्यायप्रेमी लोकांना मी विनंती करतो की या विधेयकाचा लोकशाही मार्गाने विरोध करा. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारे हे विधेयक असल्याचे ट्विट करत रहमान यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. राजीनामा दिल्याचे पत्रही ट्विटमध्ये रहमान यांनी पोस्ट केले आहे.


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झाले आहे. या विधेयकाचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, संपूर्ण भारतात विशेषत: ईशान्य भारत आणि आसाममध्ये या विधेयकाविरोधात जोरदार पडसाद उमटले आहेत. विद्यार्थी, लोक रस्त्यावर उतरून विधेयकाचा निषेध नोंदवत आहेत. ३ महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी अब्दुर रहमान यांनी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज काही तांत्रिक बाबींमुळे मंजूर होऊ शकला नाही. पण यावेळी रहमान यांनी आपण नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गोपीनाथन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून काश्मिरींना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला होता. देशात काही चुकीचे होत असल्यास जनतेला त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे, असेही गोपीनाथन यांनी स्पष्ट केले होते.

‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कन्नन यांनी बी.टेकची पदवी घेतली आहे. २०१२ मध्ये सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत ५९ वा क्रमांक पटकावला होता. केरळमध्ये अनेक महत्वांच्या पदांवर कन्नन यांनी काम केले होते. त्यांनी ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे सचिवपददेखील भूषवले आहे. तसेच जिल्हाधिकारीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.

Leave a Comment