राज्यपालांकडे रवाना ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी


मुंबई: संपूर्ण राज्याला गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेले ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज संध्याकाळी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खातेवाटपावर ठाकरे सरकारकडून शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेली सहा मंत्र्यांची खातेनिहाय यादी काहीवेळापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. यावर आता राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर सरकारकडून आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.

ठाकरे सरकारचा २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे शपथविधी सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण १३ दिवस या शपथविधीला उलटून गेल्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे महाविकासआघाडीत सर्व काही आलबेल आहे ना, अशी चर्चा सुरु झाली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही खात्यांवरून रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटप रखडले होते. परंतु, आता यावर तोडगा निघाला असून खातेवाटप निश्चित झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कालपर्यंत शिवसेनेकडेच गृहखाते राहील, असे सांगितले जात होते. पण यामध्ये अंतिम क्षणी बदल झाल्याचे समजते. त्यानुसार उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. तर शिवसेनेला नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, उद्योग, सामान्य प्रशासन, विधी, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी दहा मंत्रालये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गृह, अर्थ, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार अशा विभागांची जबाबदारी येणार आहे. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रालये सोपविली जाणार आहेत.

Leave a Comment