माझ्या अंहकारामुळेच भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले


नवी दिल्ली – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान आपल्या नावे केले आहे. पण कर्णधार विराट कोहली आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुध्द झालेला पराभव अद्याप विसरू शकलेला नाही. माझ्या अहंकारामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगल्याचे सांगत, विश्वचषकाच्या कटू आठवणींना त्याने पुन्हा उजाळा दिला.

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. भारतीय संघाने त्या दावेदारीनुसार खेळ सुध्दा केला. पण, भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडला या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमी धावसंख्येवर रोखले होते. पण भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने, १८ धावांनी भारताचा पराभव झाला.

कर्णधार विराट कोहली उपांत्य फेरीतील सामन्यांच्या पराभवाबद्दल बोलताना म्हणाला, माझ्याकडून स्पर्धेतील एका सामन्यात तरी सर्वोत्तम खेळीची अपेक्षा व्यक्त होत होती. मी उपांत्य सामन्यात नाबाद राहीन, असा मला विश्वास होता, पण एका अर्थाने तो माझा अहंकार सिद्ध झाला. ठराविक अंतराने लोकेश, रोहीत आणि मी बाद झाल्यामुळे संघावरील दडपण वाढले. त्यानंतर ठराविक अंतरात भारतीय फलंदाज बाद होत गेले आणि भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले, असे विराट एका खासगी कार्यक्रमात म्हणाला.

Leave a Comment