शरद पवारांना आता समजले असेल, जैसी करनी वैसी भरनी


सातारा : माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणे काय असते हे आज चांगलेच कळले असेल, म्हटले आहे. ५० वर्षांपूर्वी एक पाप शरद पवारांनी केले होते. जे पाप केले ते येथेच फेडावे लागते. दगा दिल्यास काय त्रास होतो, शरद पवारांना हे अनुभवायला येईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, कट्टर पवारविरोधक म्हणून शालिनीताई ओळखल्या जातात.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते. राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. हे घर अजित पवारांच्या बंडामुळे फुटले आहे. इतर राजकीय घराण्यांप्रमाणे घरफुटीचे दुःख पवार घराण्याच्याही वाट्याला आले आहे. तशा थोड्या फार कुरबुरी सगळ्या घरांमध्ये असतात. त्यातच राजकारण म्हटल्यावर तर महत्त्वाकांक्षाही जास्तच असणार. पण तरीही हे कुटुंब खंबीर आणि एकसंध होते. पण शेवटी काका-पुतण्या वैराचा वेढा बारामतीच्या पवारांना पडला.

अजित पवार, तसे थोडे भडक डोक्याचेच. पण काकांचे बोट धरुन वाढलेले आणि त्यांच्या शब्दाबाहेर नसलेले. पण राजकीय महत्त्वाकांक्षा काही स्वस्थ बसू देत नाहीत. त्यातूनच हे घडले. सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर घर फुटल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. पक्ष फुटला कुटुंब फुटले असा स्टेटस ठेवला. त्यांनी आणखी दोन ते तीन स्टेटस टाकले. ज्या कुटुंबावर आघात झाला आहे. हे सांगण्यासाठी पुरेसे होते.

अजित पवारांच्या बंडाचा धक्का रोहित पवारांनाही बसला. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांना स्वगृही येण्याची हाक दिली. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकीय खचून जाणे हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जूने चित्र कायम तसेच असावे. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावे असे मनापासून वाटते, असे रोहित पवार म्हणाले. अनेक घराणी महाराष्ट्राच्या राजकारणात फुटली. ठाकरे घराणं फुटलं. मुंडे घराणे फुटलं त्यानंतर आता पवार कुटुंब फुटले. कुटुंब फुटण्याचे दुःख दुर्दैवाने पवार कुटुंबालाही चुकले नाही.

Leave a Comment