महाराष्ट्रासह या ‘5’ राज्यांमध्ये राज्यपाल बनले भाजपसाठी ‘संकटमोचक’


मुंबई – महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला राज्यातील सत्तासंघर्ष कधी संपणार असा प्रश्न पडलेला असतानाच 23 नोव्हेंबरच्या पहाटे अनपेक्षितपणे जनतेला या प्रश्नाचे उत्तर मिळाले खरे पण या गोष्टीचा आनंद करण्याऐवजी लोकांना या गोष्टीचा धक्काच बसला. जनता वर्तमानपत्रातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बातमी सकाळच्या प्रहरी वाचत असताना अचानक वृत्त वाहिन्यांवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची बातमी कानी पडली. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हणायला हरकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांच्या निर्णयावर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

मागील 3 वर्षांत 5 राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यपालांवर भाजपबद्दल पक्षपाती करण्याचे आरोप झाले. आम्ही आज तुम्हाला त्याच राज्यांबद्दल सांगणार आहोत.

1. महाराष्ट्र: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीची 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत महाबैठक सुरू होती. यावेळी बैठकीअंती सर्वसहमतीने मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव ठरले होते. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला शपथ घेतली. मुंबईहून दिल्लीला रात्री साडेबारा वाजता जाणाऱ्या राज्यपालांनी त्यांचा दौरा रद्द केला, राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मग शपथविधी झाला.

2. मेघालय: 2018 मध्ये मेघालयच्या विधानसभा निवडणुकीत असेच काहीसे घडले. काँग्रेसकडे 21 जागा होत्या पण सरकार बनवण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यपालांनी निमंत्रण दिले. फक्त 2 जागा भाजपकडे होत्या आणि त्यांच्याशी युती करणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या आणि सरकार स्थापन करण्यात आले.

3. कर्नाटक: राज्यपाल वजुभाई वाला यांनी 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. पण विधानसभेत भाजपचे सरकार बहुमत चाचणी यशस्वी न करू शकल्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. यानंतर तेथे काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे सरकार आले. पण 17 आमदारांनी समर्थन द्यायला नकार दिला. विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या आमदारांना अपात्र ठरवले. राज्यपालांवर या प्रकरणात पक्षपातीपणाचे आरोप झाले.

4. गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीनंतर 2017 मध्ये 40 सदस्यांच्या विधानसभेत 18 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष होता. पण भाजपला सरकार स्थापनेचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आमंत्रण दिले. याविरुद्ध काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि पर्रिकरांचा शपथविधी थांबवण्याची मागणी केली. पण न्यायालयाने शपथविधी न रोखता मनोहर पर्रिकर यांना विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.

5. मणिपूर: काँग्रेसचे 28 आमदार 2017 मध्ये 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत जिंकले. 21 आमदार भाजपकडे होते पण निवडणुकीनंतर झालेल्या युतीच्या आधारे राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्याचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने तिथे सरकार स्थापन केले.

सांगायचे म्हणजे राज्यपाल हे भाजपसाठी या 5 राज्यांमध्ये संकटमोचक ठरल्यामुळे राज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोपही झाले. त्यात काही दिवसांपूर्वी झालेले महाराष्ट्रातील राजकारणाचा कायापालट म्हणजे विरोधकांसाठी आयती संधी चालून असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये.

Leave a Comment