राज्यात लवकरच बनेल महाशिवआघाडीचे सरकार


नवी दिल्ली – बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेली बैठक ही किमान समान कार्यक्रम यासाठी होती. तसेच सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा निर्णय पक्का झाला आहे. लवकरच राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनेल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थापन होईल. दिल्लीत बुधवारी आघाडीतील पक्षांची बैठक झाली, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर त्यावेळी महत्वाच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच त्यांच्यात झालेली बैठक ही किमान समान कार्यक्रमावर झाली होती, असे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बैठकीनंतर सांगितले आहे. तसेच ही बैठकी सकारात्मक झाली असून, लवकरच तीनही पक्ष अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतील आणि राज्यात डिसेंबर उजाडण्यापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थापन होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहोत. तसेच तीन पक्षांचा निर्णय पक्का झालेला आहे आणि हे सर्वपक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार आहे. तसेच मुंबईत तीनही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. पण अद्याप कोणतीही चर्चा सरकारमधील पदवाटपाबाबत झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याबाबतही अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत हे राज्य चालवणार असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. यापुढील सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Comment