शरद पवार समजून घ्यायला भाजपला घ्यावे लागतील 100 जन्म : संजय राऊत


नवी दिल्ली: भाजपवर पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरु मानतात. या लोकांनी हे लक्षात घ्यावे. पवारांना समजून घ्यायला त्यांना 100 जन्म लागतील, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. जो काही गोंधळ सुरु आहे, तो माध्यमांनी घातल्याचाही आरोपही यावेळी त्यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, सरकारं स्थापन करायला अनेकदा जास्त दिवस लागले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये तर चार-चार, पाच-पाच महिने वेळ लागला आहे. हा जो काही गोंधळ आहे तो माध्यमांच्या मनात असू शकेल. गोंधळ निर्माण करायचा ज्यांनी आहे हे ठरवलेच आहे, ज्यांनी राज्यात स्थिर सरकार येऊ नये असे ठरवलं आहे त्यांना हा पेच किंवा गोंधळ वाटत असेल. त्यामुळेच तशाप्रकारच्या बातम्या ते पसरवत असतील. कोणताही शिवसेनेच्या मनात गोंधळ नाही.

शरद पवारांना नरेंद्र मोदी गुरु मानतात. त्यामुळे शरद पवारांसोबत आम्ही जात आहोत असे म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे. या लोकांना शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील. समाजकारण आणि राजकारणातील शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबरच आहे. शरद पवार यांना विरोधात बसण्याचेच जनमत मिळाले आहे आणि आम्ही स्वतंत्र लढलो आहे. पण स्थिर सरकारसाठी आम्ही आता प्रयत्न करत असल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले.

भाजपला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला रामदास आठवलेंनी सांगितला. संजय राऊत यांनी त्यावर बोलताना रामदास आठवलेंचे आता हेच ऐकायचे बाकी असल्याचे म्हणत त्यांना कोपरखळी लगावली. ते म्हणाले, रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचे बाकी होते. केंद्रात रामदास आठवले राज्यमंत्री आहेत. केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही.

Leave a Comment