कामाचा ताण अन् कुटुंबाची जबाबदारी


अलीकडील काळात कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि सतत सजग राहवे लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे खासगी आयुष्य संपुष्टात आले आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देत येत नसल्याने काम करताना नोकरदार मंडळी अस्वस्थ राहताना दिसून येतात. एकीकडे ऑफीसचे काम आणि दुसरीकडे खासगी आयुष्य यात समतोल साधताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत समतोल साधण्यासाठी काय करता येईल, हे पाहवे लागेल.

वर्तमानकाळात राहा: घरात ऑफीसचा विचार आणि ऑफीसमध्ये घराचा विचार करून कोणताच फायदा होत नाही. आपणच स्वत:भोवती लक्ष्मणरेखा आखून घेणे गरजेचे आहे. कामाचा ताण आणि कुटुंबाची जबाबदारी आपण कशा पद्दतीने हाताळू शकतो, याचे नियोजन करावे. तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने कोणतेही काम पूर्ण केल्यास त्याचा परिणाम चांगला होतो. कामाची वेळ संपल्यानंतर फोन आणि इंटरनेटकडे दुर्लक्ष करण्याची सवय बाळगली पाहिजे.

अधिक ताण नको: काम करण्याविषयी पद्धत निश्‍चित करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, कामाबाबत अधिक विचार करणे बंद करायला हवे. सोपवलेले काम वेळेनुसार आणि कोणताही अकारण ताण न घेता पूर्ण करणे गरजेचे आहे. ताणामुळे काम होण्याऐवजी बिघडण्याचीच शक्‍यता अधिक असते.

लक्षात ठेवा: आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम कोणता आहे, याची जाणीव असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्याला देखील मोकळ्या वातावरणात काम करता यावे यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. कंपनी कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंडली वातावरण तयार करते. विविध उपक्रमांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत असते. सर्वोत्तम कर्मचाऱ्याला पुरस्कार देणे, बढती देणे, कंपनीमार्फत टूर घडवून आणणे, जबाबदारीची विभागणी करणे आदींमधून कर्मचाऱ्यांचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला जातो. काम करताना मानसिक आणि शारिरीक ताण येणार नाही, याची दक्षता कंपनीने घेतली तर कर्मचारी अधिक क्षमतेने काम करू लागतील. कर्मचाऱ्यांना कंपनीप्रती विश्‍वास निर्माण झाल्यास आणि पुरेशी काळजी घेत असल्याची जाणीव झाल्यास कर्मचारी अधिक मेहनत करतील.

ऊर्जा वाढवा: कामाचे आणि वेळेचे नियोजन अशा रितीने करावे की, आपण कमी क्षमतेतही चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करू शकू. कोणतिही नवीन जबाबदारी स्वीकारताना जुन्या जबाबदारीचे अवलोकन करणे गरजेचे आहे. अतिरिक्त कामामुळे आपल्याला होणाऱ्या फायद्यातोट्यांचा योग्य पद्धतीने ताळेबंद करणे आवश्‍यक आहे.

जीवनाचा आनंद घ्या: जर आपण जीवनाचा आनंद समाधानाने घेत असाल तर आपण काम योग्य रितीने काम पूर्ण करू शकू. म्हणूनच अधूनमधून ऑफिसमधून रजा घेऊन अथवा सुटीच्या दिवशी कुटुंबांवर सहलीवर जाण्याचे नियोजन करावे. रोजच्या कामातून काही वेळ विरंगुळा मिळावा आणि मानसिक ताण हलका राहवा यासाठी अशा प्रकारच्या लहान मोठ्या ट्रीपची गरज असते. त्यातून मन रिचार्ज होते आणि कामातील उत्साह वाढतो.

Leave a Comment