सरकार स्थापन होण्यास अजून भरपूर वेळ लागेल : पवार


नागपूर – राज्यातील सत्तासंघर्ष अजून कायम असून सर्वसामान्य जनतेच्या मनात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार येणार का? हा प्रश्न कायम आहे. हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात असे चित्र सध्या तरी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अशात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी हे वक्तव्य काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान केले. शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा करुन शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर नितीन राऊत यांच्या घरी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी १७ नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापन होणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची १७ नोव्हेंबरला पुण्यतिथी असते. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्याच दिवशी शपथ घेईल असे संकेत दिले जात होते. पण ही शक्यता शरद पवार यांनी नाकारली आहे. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे देखील नितीन राऊत यांच्या घरी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचा इतिहास १७ नोव्हेंबरला बदलून द्या, अशी इच्छा लोखंडे यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. पण १७ तारखेला सत्ता स्थापन करणे अवघड असून त्यासाठी अजून भरपूर वेळ लागेल असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

नवे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला स्थापन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेबाबत सुरु असल्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आणि ५ वर्षे तिन्ही पक्षांचे सरकार चालावे यावर आमची नजर असणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment