पवारांच्या भेटीसाठी रामदास आठवले ‘सिल्व्हर ओक’वर


मुंबई : आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आणि राजकीय वतुर्ळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रामदास आठवले यांनी भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पण आपण पवारांकडे अडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी आलो असल्याचे, यावेळी रामदास आठवले यांनी म्हटले.

आपण पवारांची भेट राज्यात निर्माण झालेल्या पेचासंदर्भात ज्येष्ठ नेत्याकडून सल्ला घेण्यासाठी घेतल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी म्हटले. पण भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळाला असल्यामुळे सरकार या दोन्ही पक्षांनी मिळून स्थापन करावे, असेच आपल्या वाटत असल्याचे पवारांनी म्हटले. त्याचबरोबर तुम्हीच शिवसेना आणि भाजपला मिळून सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असे पवारांनी म्हटल्याचेही आठवले यांनी सांगितले.

शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले, आठवले माझ्याकडे राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आले होते.पण शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात जनादेश असल्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे. आठवलेंनी मत मांडले तर ते सगळेच गांभीर्यानं घेतात, अशी पुश्तीही शरद पवार यांनी यावेळी जोडली.

महायुतीला स्पष्ट बहुमत आहे त्यांनी राज्यात स्थिरता यावी यासाठी प्रयत्न करायला हवेत, तर महायुती सरकार स्थापण्यापासून पळ काढत आहे. आणखी किती दिवस राज्यपाल आणि राष्ट्रपती थांबणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. यात राष्ट्रवादी काहीही करू शकत नसल्याचे म्हणत आपण अद्यापही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे पवार यांनी दाखवून दिल्यामुळे राज्यातील राजकीय पेचात शरद पवार काय भूमिका घेणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Leave a Comment