जनतेने युतीला कौल दिला असल्यामुळे त्यांनीच सत्ता स्थापन करावी – पवार


मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत जनतेने भाजप – शिवसेना युतीला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून काम करू असे म्हटले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत आगामी राज्यसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा झाली असून कुठलाही प्रस्ताव दिला राऊत यांनी नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेत दिल्लीत झालेल्या पोलिसांच्या हल्ल्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच लवकरच अयोध्या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता असल्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेत शांतता राखण्याचे आवाहनही यावेळी पवारांनी केले आहे. त्याचबरोबर राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांचा अंत न पाहत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

अमित शहा यांच्यासारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक – शरद पवार
यापूर्वी ४ वेळा मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यास आता कदापीही तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. काही निर्णय झाला तर आम्ही एकत्रच घेणार आहोत. पण उद्या काय होईल, हे देखील सांगता येत नसल्याचे शरद पवार म्हणाले. पण अमित शहा यांच्यासारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी आता आम्ही उत्सुक असल्याचा टोला देखील पवार यांनी यावेळी लगावला.

Leave a Comment