होय, आम्ही महाआघाडीच्या संपर्कात ; संजय राऊत


मुंबई – राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत असून सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या देखील वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत सूचक वक्तव्य केले असून आम्ही शरद पवारांच्या संपर्कात आहोत, पवारांशी बोललो तर तो अपराध झाला का? राजकारणामध्ये काहीही होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात सत्तास्थापनेचे समीकरण कसे असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.

शरद पवार हे देशाचे नेते असून ते मुख्यमंत्रीपदी येतील ही निव्वळ अफवा आहे. पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणार नाहीत. शिवसेनेने प्रस्ताव पाठविला नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने ‘वेट अ‌ॅण्ड वॉच’ अशी प्रतिक्रिया दिली. मी शरद पवारांशी बोललो त्यांना भेटलो, तर हा गुन्हा आहे का? शिवसेना पवारांशी बोलल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे, तेही कसे पवारांच्या संपर्कात आहेत, हे चागंल माहीत आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार? जागांची बेरीज वजाबाकी करून कोणाची सत्ता स्थापन होणार, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

महाराष्ट्रातील ग्रहण मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण होऊन सुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. स्थिर सरकार राज्यात यावे ही शिवसेनेची इच्छा असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युतीमध्ये लागलेल्या भांडणामुळे शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करु शकतात, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment