शेतकऱ्याचे राज्यपालांना निवेदन; तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा


मुंबई – आपल्या सर्वांना अनिल कपूर अभिनीत नायक चित्रपट आठवतच असेल त्यात अनिल कपूर हा एक दिवसासाठी मुख्यमंत्री होत आणि चमत्कारच घडवतो. आता तसाच काही प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळला तर आश्चर्य वाटायला नको. कारण बीडच्या एका तरुण शेतकऱ्याने महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडे निवेदनाद्वारे जोपर्यंत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत मला मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी केली आहे. सध्या बीड जिल्ह्यात या प्रकाराची मोठी चर्चा होत आहेच. त्याचबरोबर त्या तरुणाने राज्यपालांना दिलेले निवेदन सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहे.

थेट महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील श्रीकांत विष्णू गदळे या शेतकरी पुत्राने एक पत्र लिहून मला मुख्यमंत्री बनवा असे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झालेला आहे. श्रीकांत गदळे या तरुणाने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्यपालांना थेट पत्र लिहिले असून त्या पत्रात म्हटले आहे की, मी श्रीकांत गदळे राजकारण आणि समाजकारण यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून काम करत आहे. महाराष्ट्रात सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अशी परिस्थिती असताना देखील मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. दोन्ही पक्षाचा वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत राज्यपाल महोदयांनी मला मुख्यमंत्री करावे. मी विश्वास देतो की जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, असेही श्रीकांत गदळे या तरुणाने निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment